logo

यवतमाळच्या जलतरण तलावात तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू



जबाबदार अधिका-यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

यवतमाळ(वसीम शेख):-जिल्हा क्रीडा संकुल समिती, यवतमाळ व्दारा चालविल्या जाणा-या आझाद मैदानातील जलतरण तलावाची निवीदा मॅनेज करण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या घटनेला महिना उलटला नसतांना या जलतरण तलावात तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 6 वाजताचे दरम्यान घडली. दरम्यान पर्याप्त सुरक्षा नसतांना हा जलतरण तलाव चालविण्यात येत होता त्यामुळेच मुलांच्या जीवाशी खेळणा-या जबाबदार अधिका-यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

स्थानिक पाटीपुरा भागात राहणारा अंकित भोयर वय 27 हा तरुण काल दिनांक 4 मे रोजी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानातील जलतरण तलावात पोहायला गेला होता. दरम्यान अचानक खोल पाण्यात गेल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. याठिकाणी पर्याप्त सुरक्षा व्यवस्था नसल्याने तसेच स्विमींगचे प्रशिक्षण घेतलेले कोच नसल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे जलतरण तलाव चालविण्याचा अनुभव नसतांनाही हा तलाव सुरु करण्यात आला असून स्विमींग शिकायला आलेल्या मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे स्विमींग पुल चालविण्याचा अनुभव असलेल्या अनिल पांडे यांनी पत्रकार परीषद घेऊन एक महिण्यापुर्वीच सांगीतले होते. एवढेच नव्हे तर शहर तसेच अवधूत वाडी पोलिस स्टेशन ला जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी टोलवाटोलवीचे उत्तर देऊन त्यांना परत पाठविले होते.

यवतमाळच्या आझाद मैदान येथील शासकीय जलतरण तलाव भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी ई- निविदा मागविण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेत धनपाल ओंकार या खासगी कंत्राटदाराला वार्षिक 7 लाख 15 हजार रुपये दराने तीन वर्षांसाठी जलतरण तलाव चालविण्यास देण्यात आला. या निविदे करीता त्याने खोटी कागदपत्रे सादर केली होती. अनिल पांडे यांनी तक्रार केल्यानंतर हा करार रद्द करण्यात आला. मात्र त्यानंतर पुन्हा निवीदा काढून अनुभव असणा-या व्यक्तीला जलतरण तलाव चालविण्यास द्यायचे सोडून स्वताच जिल्हा क्रिडा संकुल समितीने तलाव चालविण्यास सुरुवात केली. फि सुध्दा कमी केल्याने गर्दी वाढली आणि प्रत्तेकाकडे लक्ष देणे अडचणीचे झाल्याची माहिती आहे. याठिकाणी अनुभवी तसेच तज्ञ प्रशिक्षक नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर एका तरुणाचा नाहक बळी गेल्याची घटना घडली. या घटनेमुळे पोहणे शिकायला येणा-या मुलांच्या पालकांमध्ये दहशत निर्माण झाली असून दोषी अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. जिल्हा प्रशासन आता या प्रकरणात काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

56
1808 views